how to apply KCC: किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करायचा? जाणून घ्या या कार्डचे फायदे?

how to apply KCC:किसान क्रेडिट कार्ड म्हणजे नेमकं काय, त्यासाठी अर्ज कसा करावा आणि किसान क्रेडिट कार्डचा उपयोग काय? याविषयीची सविस्तर माहिती जाणून घ्या.

किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

किसान क्रेडिट कार्ड म्हणजे KCC ही एक सरकारी योजना असून या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना शेती-संबंधी होणाऱ्या कामासाठी सरकारकडून आर्थिक मदत करणं हा आहे. KCCच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, कीटकनाशके या कामांसाठी कर्ज देण्यात येतं.

केसीसीकरिता देशातील अशा शेतकऱ्यांना अर्ज करता येतो, ज्यांच्याकडे स्वत:च्या मालकीची जमीन किंवा ज्यांनी इतरांची जमीन भाडेतत्वावर घेतलेली आहे.

याबरोबरच 2018-2019च्या अर्थसंकल्पीय अधिवेशना-दरम्यान पशुपालन जसे की शेळीपालन, मेंढीपालन कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ देण्याचे सुनिश्चित करण्यात आले आहे.

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा?

फेब्रुवारी 2019मध्ये भारत सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार देशात सुमारे 6.95 कोटी शेतकरी KCC वापरत असल्याचे सांगण्यात आले. तरी देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी KCCद्वारे मिळणाऱ्या कृषी कर्जापासून वंचित राहत असल्याचे शासनाच्या निर्दशनास आले.

त्यामुळेच नंतर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना KCC उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने फेब्रुवारी 2020मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या सर्व लाभार्थ्यांचा KCC योजनेत समावेश करण्याची एक मोहीमच हातात घेतली. आणि या मोहिमेचाच एक भाग म्हणून सरकारने पीएम-किसान योजनेच्या वेबसाईटवरच किसान क्रेडिट कार्डसाठीचा अर्ज उपलब्ध करून दिलेला आहे.

शेतकऱ्यांना अर्ज डाऊनलोड करण्याकरिता प्रथम गुगलवर PM Kisan असे टाईप केले की तुमच्यासमोर पंतप्रधान किसान सन्मान निधीची अधिकृत वेबसाईट उघडेल. या वेबसाईटवर उजव्या कोपऱ्यात Download KCC Form या पर्यायावर क्लिक केल्यास क्रेडिट कार्डसाठीचा अर्ज ओपन होईल.

“Loan application form for agricultural credit for PM-KISAN beneficiaries” म्हणजे पीएम-किसान योजनेरील लाभार्थ्यांकरिता कृषी कर्ज करण्यासाठीचा अर्ज असे या अर्जाचे शीर्षक आहे.

हा अर्ज कसा भरायचा?

  • या अर्जात सगळ्यात वर टू ब्रँच मॅनेजरच्याखाली तुमच्या बँकेचं आणि शाखेचं नाव टाकायचं आहे.
  • नंतर अर्जातील A या भागासमोर “फॉर ऑफिस यूझ” लिहिलेलं असून या भागात माहिती बँक भरणार आहे.
  • B या भागामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचं KCC हवें म्हणजेच नवीन kcc, जुनं kcc मधील कर्ज मर्यादा वाढवायची आहे की, काही कारणामुळे kcc बंद पडलेलं असेल, तर त्याला पुन्हा सुरू करणं याची सविस्तर माहिती भरावी आणि त्याखाली तुम्हाला किती रुपयांचं कर्ज पाहिजे ते लिहा.
  • नंतर C या भागामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव, पीएम-किसान सन्मान योजन अंतर्गत पैसे ज्या बँक खात्यात जमा होतील तो खाते क्रमांक आणि तुम्हाला जर का प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेतंर्गत विमा (इन्शुरन्स) घ्यायचा असल्यास त्यासमोर YES या पर्यायावर टिक करा.
  • पण जर का तुम्ही YES वर टिक केलं तर दरवर्षी तुमच्या खात्यातून प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेसाठी 12/- आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेसाठी 330/- असे एकूण 342 रुपये कापले जाणार आहेत. पण या दोन्ही योजनअंतर्गत तुम्हाला 2 लाख रुपयांचं विमा कवच मिळणार आहे.
  • त्यापुढे D या विभागातील रकाण्यात तुमच्यावर सध्या असलेल्या कर्जाची माहिती द्यावयाची असून जसे की, तुम्ही कोणत्या बँकेकडून कर्ज घेतलं, त्या शाखेचं नाव काय, कर्जाची एकूण किती रक्कम शिल्लक थकबाकी किती आहे, ते लिहायचं आहे.
  • त्यानंतर E या विभागातील रकाण्यामध्ये तुमच्या जमिनीबद्दलची सविस्तर माहिती द्यायची आहे. म्हणजे गावाचे नाव, सर्वे / गट क्रमांक, जमीन स्वत:च्या मालकीची आहे की भाडेतत्वानं करत आहात की सामायिक मालकीची आहे, त्यासमोरील पर्याय टिक कराव7यचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे किती एकर शेती आहे आणि खरीप, रबी आणि इतर कोणती पीकं घेतली जातात, त्याबद्दलची माहिती भरायची आहे.
  • त्यानंतर F हा रकाना मत्स्यपालन व पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता आहे. यामध्ये तुमच्याकडे दुध देणारे प्राणी, शेळ्या / मेंढ्या, डुकरं आणि कोंबड्या किती आहेत, यांची माहिती भरायची आहे. त्याखाली मत्स्यपालन यात इनलँड फिशरिज म्हणजे टँक, पाँड यात मच्छिपालन करता की, मरिन फिशरिज म्हणजेच समुद्रात जाऊन मासेमारी करता ते सांगायचं आहे.
  • यानंतर तारण म्हणून कोणती मालमत्ता गहाण ठेवणार, त्याची माहिती भरल्यानंतर शेवटी सही करायची आहे.
  • नंतर Acknowledgment हा भाग बँकेकरिता असून त्यामध्ये शेतकऱ्याला कोणतीही माहिती भरण्याची गरज नाही.
  • हा अर्ज भरल्यावर शेतकऱ्यांनी त्याची प्रिंट काढून त्यासोबत ७/१२ उतारा आणि 8-अ, इतर बँकेतून कर्ज न घेतल्याचे शपथपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड बरोबरच तीन पासपोर्ट साईज फोटो घेऊन जावे लागणार आहेत. ही कागदपत्रं तुम्ही बँकेत जमा केली की, पुढच्या दोन आठवड्यच्या आत तुमच्या पत्त्यावर बँकेनं कार्ड पाठवायला हवं, असं सरकारनं आदेश दीलं आहे.

KCC हे थेट शेतकऱ्याच्या बचत खात्याशी लिंक केलं असतं. KCC ची वैधता 5 वर्षे असली, तरी सुद्धा दरवर्षी ते ‘रिन्यू’ करणं आवश्यक आहे. किसान क्रेडिट कार्ड मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया निशुल्क असून 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी बँकांनी कोणतेही शुल्क आकारू नये, असे आदेश इंडियन बँक असोसिएशनने दिले आहेत.

आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे वरील अर्ज केवळ पीएम-किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांसाठीच आहे. पण, याचा अर्थ असा मुळीच नाही की जे तुम्ही KCC योजनेचे लाभार्थी नाही तर तुम्हाला KCC कार्ड मिळणार नाही. तुम्हाला सुद्धा किसान क्रेडिट कार्ड मिळू शकते.

त्यासाठी तुम्हाला बँकेत गेल्यावर सांगायचे आहे की तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी नाही, पण तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड हवं आहे, तर तिथं तुम्हाला इंडियन बँक असोसिएशननं कृषी कर्जासाठी बनवलेला स्टँडर्ड फॉरमॅटमधील अर्ज देण्यात येईल. तुम्ही फॉर्म सविस्तर भरून आवश्यक कागदपत्रांसहित तुमच्या बँकेमध्ये दाखल करू शकता.

Kcc साठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं देखील अर्ज करता येतो.

ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा असल्यास ही फॅसिलिटी फक्त CSC किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरच उपलब्ध असून शेतकरी किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करू शकत नाही. त्यासाठी त्यांना CSC किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरच जाऊन क्रेडिट कार्डसाठीचा फॉर्म भरावा लागतो. त्यासाठी शेतकऱ्यांकडून एक शुल्क आकारण्यात येतो.

आता जाणून घ्या किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकऱ्यांना किती कर्ज दिलं जातं.

  • Kccअंतर्गत शेतकऱ्याला किती कर्ज द्यवयाचं आहे हे त्या शेतकऱ्याचं उत्पन्न किती आहे, त्याच्याजवळ जमीन किती आहे आणि त्या जमिनीतील लागवडीयोग्य क्षेत्र किती आहे, यावरून ठरवण्यात येतं.
  • KCC अंतर्गत शेतकऱ्याला तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येतं. इथं मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा आणि ती म्हणजे 1 लाख 60 हजारापर्यंत विनातारण कर्ज तर त्यापेक्षा अधिक पण 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जा करिता तारण ठेवने गरजेचं आहे.
  • KCCवरून जे कर्ज दिलं जातं त्यावर 7 % व्याजदर आरण्यात येतो. पण जर का संबंधित शेतकरी कर्जाची परतफेड वर्षभराच्या आत करणार असेल, तर त्याला व्याजदरामध्ये 3 % सवलत देण्यात येते. म्हणजे फक्त 4 % व्याजदारानं शेतकऱ्यांना कर्ज मिळतं. कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री करून या कर्जाची परतफेड करणं अपेक्षित असतं. यामध्ये आणखी एक लक्षात घेण्यासाठीची गोष्ट म्हणजे 1 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज हे बिनव्याजी कर्ज असतं.
  • याचा अजून एक फायदा म्हणजे किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आलं, तर त्यासाठी त्याला 50000/- रुपयांचं विमा संरक्षण दिलं जातं, तसंच इतर धोक्यांसाठी 25 हजार रुपयांचं विमा संरक्षण दिलं जातं.

Similar Posts